मुरूम शहरातील अतिक्रमणावर धडक कारवाई; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

मुरुम (जि. धाराशिव): मुरूम (ता. उमरगा) नगरपरिषद प्रशासनाने शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम गुरुवारी (ता. २२) दिवसभर राबवली. शिवाजी महाराज चौक ते महात्मा बसवेश्वर चौकापर्यंतची कच्ची व पक्की अतिक्रमणे पाडण्यात आली. अतिक्रमणधारकांनी पालिकेच्या या मोहिमेचा चांगला धसका घेतला आहे. अनेकांनी कारवाईपूर्वीच आपली अतिक्रमणे काढून घेतली होती. पालिका प्रशासनाच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरपालिकेने सदर अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेला यश मिळत आहे. शहरांतील मुख्य मार्गावरून जाणाऱ्या रस्त्यावरील टपऱ्या, हातगाड्या, पक्की अतिक्रमणे, पत्र्याचे शेड, ओटे व पायऱ्या जेसीबीद्वारे पाडण्यात आल्या. विशेष म्हणजे पहिल्या दिवसापासूनच सर्वसमावेशक कारवाई करण्यात येत असल्याने मोहीम फत्ते झाली आहे. नगरपालिकेकडून प्रथमच अशी कारवाई झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. फेरीवाले, भाजीवाले, खाद्यपदार्थ, चहाच्या टपऱ्या, तसेच दुकानांच्या फलकांनी शहरातील रस्ते अडवल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर निर्माण झाला होता. या कारवाईमुळे शहरातील अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू असल्याने अतिक्रमणधारकांचा फारसा विरोध झाला नाही. उलट कारवाईच्या भीतीपोटी अनेकांनी आपले अतिक्रमण स्वत:च काढून घेतली आहेत. अतिक्रमण काढू नये, यासाठी अनेकजण फोनाफोनी करून राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न करून मुख्याधिकाऱ्यांनी राजकीय हस्तक्षेप न जुमानता कारवाई सुरूच ठेवली आहे. पुन्हा व्यवसायिकाकडून अतिक्रमण होणार नाही याचीही काळजी येणाऱ्या काळात प्रशासनाने घेऊन रस्ते मोकळे राहतील याची दक्षता घेण्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. चौकट : सदरच्या अतिक्रमणामुळे पान टपरी, चहा टपरी वाले ज्यांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून होता. ते व्यावसायिक उघड्यावर आल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून नगर प्रशासनाने त्यांना वेगळी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी छोट्या-मोठ्या व्यवसायिकाकडून होताना दिसून येत आहे.





