लातूर येथील लिंगायत समाजाच्या आरक्षण मोर्चास बहुसंख्येने उपस्थित रहा: सातलिंग स्वामी

लोहारा(जि. धाराशिव): शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वात वीरशैव लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, यासाठी सोमवारी (दि. ३० आक्टोंबर) सकाळी अकरा वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये समस्त वीरशैव लिंगायत समाज बांधव, भगिनी, तरूण, तरुणी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींनी मोर्चात सहभागी होऊन वीरशैव लिंगायत समाजाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सातलिंग स्वामी यांनी केले आहे.
आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, हिंदू लिंगायतसह उर्वरित पोटजातींनाही आरक्षण मिळण्यासाठी आपले सर्व काम बाजूला सारून एक दिवस आपल्या समाजाच्या, आपल्या पिढीच्या हितासाठी या मोर्चात सहभागी होणे आवश्यक आहे. गुणवत्ता असूनही हक्काचं आरक्षण नाही, भरमसाठ फी आणि शिक्षणानंतरची बेरोजगारी हे दुष्टचक्र थांबवायचं असेल तर मोर्चाला यावचं लागेल. वीरशैव लिंगायतांनी, वीरशैव लिंगायत सोबत, वीरशैव लिंगायतासाठी उभं राहण्यासाठी वेळ काढावाचं लागेल. मोर्चासाठी केवळ लातूर जिल्ह्यातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लिंगायत समाज बांधवांनी येऊन आपली एकजूट दाखवून द्यावी, तर आणि तरच समोरच्यांना धडकी बसेल व लिंगायत समाजास आरक्षण मिळेल यात शंकाच नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.





