
मुरुम (जि. धाराशिव): मिलिंद महाविद्यालयाच्या इमारतीतून सुरु झालेले विद्यापीठाचे कामकाज, भौतिक सेवा सुविधा, उच्च शिक्षणातील प्रगती, स्वतंत्र उपकेंद्राची स्थापना, विविध शाखांचा विस्तार आणि विद्यापीठाचा वाढता आलेख पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास जे नाव देण्यात आले त्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो. त्यानंतरच्या काळातील मिलिंद महाविद्यालयातील नवशिक्षित तरुणांनी सुरु केलेला १९७६ मध्ये तीव्र झालेला नामांतराचा लढा ते १९९४ चे नामविस्तार आणि आतापर्यंतच्या विद्यापीठाची वाटचाल या सर्व ऐतिहासिक घडामोडींचा आढावा त्यांनी मांडला. डॉ. आंबेडकरांची शैक्षणिक क्षेत्रातील दूरदृष्टी आजच्या तरुणांनी अभ्यासली पाहिजे असे प्रतिपादन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सायबण्णा घोडके यांनी केले. मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. २३) आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व कै. माधवराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ ध्वज फडकावून विद्यापीठ गीत गाऊन, विद्यापीठ वर्धापन दिन चिरायू होवो ! अशा घोषणा देवून वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. व्याख्यानाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रतापसिंग राजपूत, डॉ. शिला स्वामी, प्रा. अशोक बावगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक बावगे तर आभार प्रा. डॉ. शिला स्वामी यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.





