लोहारा शहरात काँग्रेस पक्षाची बैठक; विखुरलेले कार्यकर्ते आले एकत्र

लोहारा (जि. धाराशिव): काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षाला लोहारा तालुक्यात उतरतीकळा लागल्याचे चित्र होते. परंतु, मंगळवारी (दि. २३) लोहारा शहरात घेण्यात आलेल्या बैठकीला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने लावलेली हजेरी पक्षाला बळ देणारी ठरली. माजी मंत्री बसवराज पाटील यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बसवराज पाटील यांचे लोहारा तालुक्यावर कायम वर्चस्व राहिले आहे. परंतु, मागील दीड महिन्यापूर्वी बसवराज पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याचा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. तालुक्यात काँग्रेस पक्षाची स्थिती नाजूक झाली. बसवराज पाटील यांना मानणाऱ्या व काँग्रेसची विचारधारा जोपसणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्था निर्माण झाली. पहिल्या फळीतील काही मोजके पदाधिकारी, कार्यकर्ते बसवराज पाटील यांच्या सोबत गेले. तर, दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील पक्षाची विचाराधारा जोपासणारे निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते जाग्यावर राहिले. मात्र, तालुक्यात पक्ष नेतृत्व नसल्याने ते खचून गेले होते. परंतु, काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा सरचिटणीस रौफ बागवान यांनी पुढाकर घेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोहारा शहरात मंगळवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू, ज्येष्ठ नेते नागण्णा वकील, माजी सरपंच शंकर जट्टे, माजी तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव, महेश देशमुख, यांची प्रमुख उपस्थिती होती. या झालेल्या बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ राहात पक्ष वाढविण्याचा संकल्प केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात हुकूमशाही आणू पाहात आहेत. त्यामुळेच शासकीय यंत्रणेचा दुरूपयोग केला जात असल्याचा आरोप करून लोकशाही वाचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या मागे ताकद उभी करण्याचे आवाहन केले. यावेळी नागनाथ पत्रिके, दिलीप पाटील, इस्माईल मुल्ला, उमरगा तालुकाध्यक्ष अॅड. विलास राजोळे, चंद्रकात साखरे, बसवराज वकील, प्रकाश होंडराव, प्रकाश चव्हाण, सुरमा पाटील, रफीक शेख, केशव सरवदे, प्रभाकर बिराजदार, विठ्ठल पाटील, ओम पाटील, अॅड. संगमेश्वर माशाळकर, सचिन माळी, वीर फावडे, केशव पाटील, शरणप्पा शेगजी, अॅड. वैरागकर, भगवान मक्तेदार, शिवा स्वामी, सुनील वाले, मल्लिनाथ बनशेट्टी, माणिक चिकटे, नजीर सिद्दकी, सुक्षेण टेलर, योगेश मिटकरी, छोटू विरोधे, हुसेन शेख, अप्पू स्वामी, संगाप्पा मुके, रज्जाक खडीवाले, संजय मिटकरी, सिराज सिद्दकी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





