आयुष्यमान भव: अभियानाचा लोहारा शहरात शुभारंभ

लोहारा (धाराशिव): केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात असलेल्या आयुष्यमान भव: अभियानाचा शुभारंभ बुधवारी (दि.१३) शहरातील ग्रामीण रूग्णालयात करण्यात आला. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी १३ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान आयुष्यमान भव: अभियान केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत ठिकठिकाणी आरोग्य सभा घेण्यात येणार आहेत. आयुष्यमान कार्डाचे वितरण करणे, गरोदर मातांची तपासणी करणे, रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासह विविध आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या अभियानाचा शुभारंभ ग्रामीण रूग्णालयात करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, माजी नगरसेवक गगन माळवदकर, रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. गोविंद साठे, कल्पना मिटकरी, साजेदा शेख, विजया रोडगे, पार्वती चोपडे, श्रावणी रोडगे, सुजाता ठेले, सुरेखा रोडगे, शिल्पा स्वामी, गीता कोकणे यांच्यासह आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.





