
लोहारा (जि. धाराशिव): हिंगोली जिल्ह्यातील एका तलाठ्याचा निघृण खून केल्याच्या घटनेचा येथील तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी गुरूवारी (दि. २९) काळी फिती लावून निषेध करून आरोपीला कडक शासन करण्याची मागणी केली आहे. हिंगोलीे जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा सज्जाचे तलाठी संतोष पवार यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून चाकुने भोसकून त्याचा निघृण खून केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. येथील तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून दिवसभर कामकाज करीत या घटनेचा निषेध केला आहे. मागील काही वर्षांपासून अधिकारी कर्मचाऱ्यांवर खुनी हल्ले करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकांची प्रश्नांची सोडवणूक करीत असताना कर्मचाऱ्यावर जीवघेणे हल्ले करणे हे अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. आरोपीला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी महसूल कर्मचाऱ्यांनी केली आहे. यावेळी तहसीलदार काशीनाथ पाटील, नायब तहसीलदार नाना मोरे, पेशकार अशोक शिंदे, भागवत गायकवाड, वजीर अत्तार, महादेव जाधव, नरसिंह ढवळे, प्रवीण माटे, अभिजीत गायवाड, पवन पुरी, आनंद राठोड, सभाजी शिंदे आदी उपस्थित होते.




