लोकसभा निवडणूक मतपत्रिकेवर घ्या; तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी
तहसीलदारमार्फत मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन

लोहारा (जि. धाराशिव): इलेक्ट्रिक वोटिंग मशिनद्वारे (ईव्हीएम) घोटाळे घडत असून, मतदान प्रक्रिया पारदर्शक होत नाही. निवडणूक पारदर्शकपणे होण्यासाठी आगामी लोकसभेची निवडणूक मतपत्रिकेवर घेण्यात यावी, अशी मागणी नागरिकांसह महविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. १२) तहसीलदारमार्फत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. यावेळी नागरिकांनी ‘ईव्हीएम मशीन हटाओ देश बचाओ’ अशी जोरदार घोषणाबाजी केली.
प्रगत देशांमध्येही ईव्हीएम मशीनवर बंदी आहे. तेथे मतदानासाठी ईव्हीएमचा वापर केला जात नाही. परंतु, भारतात ईव्हीएमचा वापर करून २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मतदारांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच २०१९ निवडणुकीतही प्रत्यक्ष झालेले मतदान व मत मोजणीतील मतांची तफावत दिसून येते. याचा अर्थ मतांची चोरी केली जात आहे. ही लोकशाहीविरोधी कृती आहे. निवडणुका पारदर्शकपणे होत नाहीत. ईव्हीएम मशीन हॅक होऊन मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केले की नाही, याबाबत मतदारांमध्ये संभ्रम आहे. मताची हेराफेरी केली जात असल्याने ईव्हीएमवर मतदारांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेऊन पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, या मागणीचे तहसीलदार काशिनाथ पाटील यांना दिलेल्या निवेदन केली आहे. त्यानंतर नागरिकांनी ईव्हीएम हटाव देश बचाव अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष नरदेव कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष अयनोद्दीन सवार, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, महेबूब गवंडी, नगरसेवक विजयकुमार ढगे, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, नवाज सय्यद, रौफ बागवान, निशिकांत गोरे, के. डी. पाटील, तानाजी माटे, यशवंत भुसारे, गोपाळ माने, पिंटू गोरे, प्रेम लांडगे, अमीत वाघ, बसवराज पाटील, विलास जेवळीकर, शिवहार नारायणकर, आकाश जावळे, अशोक भोसले, कुलदीप बडुरे, कांत पवार, रवी परसे, विपूल बडुरे, लक्ष्मण रोडगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.





