राज्य सरकारच्या तुघलकी कारभाराविरोधात फकिरा ब्रिगेडचा लोहाऱ्यात रास्ता रोको

लोहारा (धाराशिव): सरकारी शाळा भांडवलदारांना दत्तक देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी फकिरा ब्रिगेडच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी १३ ऑक्टोंबर रजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारचा सुरू असलेल्या तुघलकी कारभाराबाबत नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कंत्राटी पध्दतीने नोकर भरती, दत्तक योजनेच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या शाळा भांडवलदारांच्या घश्यात घातले जात असल्याच्या निषेधार्थ फकिरा ब्रिगेडने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आदोलन केले. रमाई घरकुलसह अन्य घरकुल योजनेसाठी शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येकी लाभार्थ्यांना पाच लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, विधवा, परितक्त्या, दिव्यांगाचा सर्वे करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, कंत्राटी पध्दतीने करण्यात येणारी नोकर भरती आणि भांडवलदारांना शाळा दत्तक देण्याचा निर्णय त्वरीत रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले. यावेळी फकिरा ब्रिगेडचे लक्ष्मण खंडाळे, श्रीरंग सरवदे, सुरेखा गायकवाड, नागिणी थोरात, स्वराज्य संघटनेचे महेश गोरे, तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात उपस्थित होते.





