राज्य
लोहारा तालुक्यावर दुष्काळाची गडद छाया; दुष्काळ जाहीर करण्याची विविध संघटानांकडून मागणी

लोहारा (जि.धाराशिव):मागील महिन्याभरापासून पाऊस गायब झाला आहे. परिणामी तालुक्यातील खरिपाची पिके करपू लागली आहेत. ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेला आहे. पाऊस नसल्यामुळे तालुक्यातील परिस्थिती भयावह आहे. त्यामुळे लोहारा तालुक्यात दुष्काळाची गडद छाया निर्माण झाल्याने दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्या अनुषंगाने उध्दव बाळासाहेब ठाकरे, स्वराज्य संघटना, गयाबाई रावसाहेब पाटील बहुउद्देशिय संस्था, संभाजी ब्रिगेड यासह विविध संघटनांनी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
- लोहारा तालुक्याचे अर्थचक्र शेतीवर अवलंबून आहे. परंतु मागील काही वर्षापासून तालुक्यातील प्रजन्यमान अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यंदा चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा बळिराजाला होती. परंतु निसर्गाने ही अपेक्षा फोल ठरवली. यंदा पाऊस काही वेळेत झाला नाही. जून महिन्याअखेरीस हलका पाऊस झाला. यावळी बळिराजाने पाऊस पडेल या आशेने तुरळक झालेल्या पावसावर पेरणी केली. त्यानंतर अधूनमधून झालेल्या तुरळक पावसावर खरिपाची पिके बहरली. परंतु ऑगस्ट महिन्यात अचानक पावसाने खंड दिला. तब्बल महिनाभर पाऊस होतन सल्याने पावसाअभावी खरिपाची पिके वाया जात आहेत. खासगी सावकाराचे, बँकांचे कर्ज काढून शेतकऱ्यांनी महागा मोलाची खत, बियाने व त्यांची मेहनत वाया जाण्याची शक्यता अधिक आहे. त्याुळेशेतकरी अडचणीत सापडला आहे. लोहारा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये २१ दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यामुळे पीक विम्याचा २५ अग्रिम पिक विमा देण्यात यावा, शेतकऱ्यांना ५० हजार रूपये आर्थिक मदत करावी, जनावरांसाठी चारा उपलब्ध कूरून द्यावा, शासनाच्या विविध दुष्काळी योजना लागू करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी विविध संघटनांनी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी याच्याकडे स्वतंत्र निवेदनाद्वारे केली आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अॅड. दीपक जवळगे, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलीम शेख, शिवदुत महेबूब गवंडी, माजी नगरसेवक श्याम नारायणकर तर स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात, महेश गोरे, उपाध्यक्ष तानाजी पाटील, सचिव बळी गोरे, कार्याध्यक्ष युवराज साळुंखे, संजय मुरटे, महेश सुतार, व्यंकटेश पोद्दार, दयानंद सुतार तसेच लोहारा (खुर्द) येथील गयबाई रावसाहेब पाटील बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने माजी सरपंच शोभा पाटील, शेखर पाटील, दादासाहेब पाटील, धनाजी सूर्यवंशी, काशिनाथ कांबळे, ज्योती पाटील, पुष्पा पाटील, तर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बालाजी यादव उपस्थित होते.





