आठवडे बाजारात प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी, सास्तूर ग्रामपंचायतीचा निर्णय

लोहारा (जि. धाराशिव): महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने राबविण्यात येत असलेल्या एक तास श्रदान उपक्रमादरम्यान रविवारी (ता. एक) तालुक्यातील सास्तूर ग्रामपंचायतीने आठवडे बाजारात प्लास्टिक पिशवी वापरावर बंदीचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायत, निवासी दिव्यांग शाळा, शांतेश्र्वर दिव्यांग कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, शांतेश्वर विद्यालय यांच्या वतीने सास्तूर येथे ग्राम स्वच्छता मोहीम, स्वच्छता जनजागरण रॅली काढण्यात आली. निवासी दिव्यांगशाळेपासून स्वच्छता रॅलीस प्रारंभ झाला. माजी सरपंच विजयकुमार क्षीरसागर व टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील दीपक चौधरी, प्रभांश दीक्षित, गरिमा कुठेल, मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांनी हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. गावातील प्रमुख रस्त्याने स्वच्छतेच्या घोषणा देत रॅली निघाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिव्यांग शाळेतील विद्यार्थीनी संध्याराणी कदम, सौंदर्या कुकुर्डे, सोनाली बेळे, किरण खराते, सरस्वती पूजारी अर्चना शिंदे यांनी पथनाट्याचे सादरीकरण करून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. त्यानंतर सर्वांनी मिळून एक तास श्रमदान केले. मुख्य झालेल्या कार्यक्रमात सरपंच शीतल पाटील यांनी आठवडे बाजारात प्लास्टिक पिशवी वापरण्यावर ग्रामपंचायतीने बंदी घातली असल्याचे सांगून आपलं गाव आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामपंचायतीच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार शीतल पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहूल पाटील यांनी सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोविंद यादव, गंगाधर पवार, रमेश भुरे, पंचायत समितीचे किरण निंबाळकर, ग्रामविकास अधिकारी दयानंद गोरे, मुख्यध्यापिका शेवंता कांबळे, धनंजय चिंचुरे, शेषेराव पवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.





